नेत्यांची संपर्क कार्यालयांची संख्या वाढली,जनतेचे प्रश्न मात्र जैसे थेच!ही कार्यलये नेमकी कुणाच्या सोयीसाठी?


विशाल अ चव्हाण
प्रशासक न्यूज,दि.५ऑगस्ट२०२४

श्रीगोंदा तालुका हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुका,साखर कारखानदारांचा तालुका म्हणून ओळखला जातो साहजिकच तालुक्यात राजकीय नेत्यांची संख्या मोठी आहे यातील अनेक नेत्यांनी श्रीगोंदा शहरात जनतेशी संपर्क रहावा त्यांचे प्रश्न सोडवता यावेत या हेतूने संपर्क कार्यालये सुरु केली आहेत ही कार्यलये सामान्य जनतेच्या सेवेसाठी असल्याचे नेते सांगत असले तरी मात्र श्रीगोंदा तालुक्यातील जनतेचे अगदी सामन्य प्रश्न आजही जैसे थेच असल्याचे चित्र बघायला मिळत आहे त्यामुळे शहरात दिवसांगणिक वाढणारी ही संपर्क कार्यालये नेमके कुणाच्या फायद्यासाठी असा प्रश्न आता सर्वसामान्य लोकांना पडला आहे

आमदार बबनराव पाचपुते,माजी आमदार राहुल जगताप,नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे,काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार,जेष्ठ नेते बाबासाहेब भोस आता नव्यानेच उदघाट्न झालेले शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते अश्या सर्वच प्रमुख नेत्यांची शहरात संपर्क कार्यालये आहेत असे असूनसुद्धा तालुक्यातील नागरिकांना किरकोळ कामासाठी प्रशासकीय कार्यलयात दररोज हेलपाटे मारावे लागत आहेत परंतु प्रश्न सुटत नाहीत

अगदी शाळेच्या विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले,उत्पन्न दाखले,रेशनींग संदर्भातील समस्या,याशिवाय वीजमंडळ, एसटी महामंडळ,पंचायत समिती,तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन,ग्रामीण रुग्णालय,यासह अनेक शासकीय कार्यालयात लोक हेलपाटे मारून थकले आहेत परंतु याबाबत नेमकी दाद कुणाकडे मागावी याबाबत तालुक्यातील जनतेसमोर प्रश्न उभा राहिला आहे

कारण मोठा गाजावाजा करत संपर्क कार्यलये नेत्यांनी सुरु केलीत खरी पण ती कार्यकर्त्यांच्या सोयीचीच ठरताना दिसत आहेत तालुक्यात एवढे नेते असूनसुधा कुणाचीच प्रशासनावर पकड नाही त्यामुळे शासकीय अधिकारी,कर्मचारी गेंड्याच्या कातडीसारखी झाले असून सामान्य लोकांशी ते उद्धट वागत आहेत लोकांचे प्रश्न सोडवण्या पेक्षा आर्थिक मलई कमवण्यातच त्यांना जास्त रस आहे शासकीय कार्यलयात किरकोळ कामासाठी देखील लोकांना पैसे मोजावे लागत आहेत याबाबत मात्र तालुक्यातील कोणताच नेता लक्ष द्यायला तयार नाही जनतेला न्यायचं मिळणार नसेल तर मग ही नुसती संपर्क कार्यालये काय कामाची?

*संपर्क कार्यालयात भेटीची वेळ हवी,समस्येचे लगेच निवारण व्हावे*
नेत्यांनी सामान्य लोकांना भेटण्यासाठी आठवड्यातून ठराविक वार ठरवून देऊन त्या दिवशी लोकांच्या समस्या ऐकून घेऊन संबंधीत विभागाकडे त्याबाबतीत पाठपुरावा करून तात्काळ समस्या सोडवायला हवी त्यामुळे लोकांना मध्ये नेत्यांबद्दल विश्वास वाढेल

*विविध दाखले,रेशनींग कार्ड तसेच शासकीय योजना याबाबत यंत्रणा राववावी*
विद्यार्थ्यांसह,सामान्य लोकांना विविध शासकीय दाखले,रेशनींग कार्ड यासह अनेक कामांसाठी विविध शासकीय कार्यलयात हेलपाटे मारावे लागतात परंतु त्याठिकाणी हेलपाटे मारूनही काम होत नाही लोकांचे हेलपाटे थांबवण्यासाठी नेतेमंडळींनी आपल्या संपर्क कार्यलयात एक यंत्रणा राबवून त्याठिकाणी नागरिकांना असे शासकीय दाखले मिळवून देऊन किंवा इतर तक्रारी सोडवण्यासाठी आणि विविध शासकीय योजना संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे

*कुकडी,घोड,एमआयडीसी या प्रश्नावर राजकारण करण्यापेक्षा सामान्य प्रश्नांना महत्व देणे गरजेचे*

श्रीगोंदा तालुक्याचे राजकारण घोड, कुकडी पाणी प्रश्नाभोवती फिरत असते त्यातच निवडणुका आल्या की नेत्यांना एमआयडीसी ची आठवण येते परंतु मागील चाळीस वर्ष्यापासून याच प्रश्नावर राजकीय नेते राजकारण करतात परंतु हे प्रश्न जैसे थेच राहिलेत कुकडीचा पाणी प्रश्न सुटण्या ऐवजी राजकारण्यांचा राजकीय हस्तक्षेप आणि राजकारण यामुळे तो जास्त जटील बनत चालला आहे त्यामुळे या प्रश्नावर राजकारण थांबवून तालुक्यातील अनेक वाडी वास्त्यांवर रस्त्यांची सोय नाही, पाण्याची सोय नाही आरोग्यसंदर्भातील अनेक समस्या आहेत अनेक ठिकाणी वीज नाही अश्या लोकांच्या मूलभूत प्रश्नावर आता नेत्यांनी लक्ष घालून ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे
नुसते दहावे,वाढदिवस,लग्नसमारंभ अश्या कार्यक्रमाना हजेरी लावून चालणार नाही तर सामान्य लोकांचे शासन दरबारी हेलपाटे थांबतील,त्यांचे प्रश्न सुटतील यासाठी सर्व नेते मंडळींनी प्रामाणिक प्रयत्न केले तरच खऱ्या अर्थाने ही संपर्क कार्यलये सुरु करण्यामागचा हेतू साध्य होईल

नेत्यांची संपर्क कार्यालयांची संख्या वाढली,जनतेचे प्रश्न मात्र जैसे थेच!ही कार्यलये नेमकी कुणाच्या सोयीसाठी? नेत्यांची संपर्क कार्यालयांची संख्या वाढली,जनतेचे प्रश्न मात्र जैसे थेच!ही कार्यलये नेमकी कुणाच्या सोयीसाठी? Reviewed by Prashasak on ऑगस्ट ०५, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.